Proverbs (12/31)  

1. जर एखाद्याला चांगले व्हायचे असेल तर त्याची चूक दाखवल्यावर त्याला राग यायला नको. ज्याला चूक दाखवलेली आवडत नाही तो मूर्ख असतो.
2. परमेश्वर चांगल्या माणसांबरोबर आनंदी असतो. पण परमेश्वर दुष्ट माणसाला अपराधी ठरवतो.
3. दुष्ट माणसे कधीही सुरक्षित नसतात. पण चांगली माणसे सुरक्षित आणि निर्धास्त असतात.
4. नवरा चांगल्या बायकोबद्दल आनंदी आणि अभिमानी असतो. पण जर बाई आपल्या नवऱ्याला लाज आणत असेल. तर ती त्याच्या शरीरातल्या आजारा सारखी असते.
5. चांगले लोक त्यांनी ज्या योजना आखलेल्या असतात त्यात न्यायी आणि इमानी असतात. पण दुष्टांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका.
6. दुष्ट लोक दुसऱ्यांना दु:ख देण्यासाठी आपल्या शब्दांचा वापर करतात. पण चांगल्या माणसाचे शब्द एखाद्याला संकटापासून वाचवू शकतात.
7. दुष्ट माणसांचा नाश होतो आणि त्यांचा मागमूसही राहात नाही. पण चांगल्या माणसाची आठवण मात्र तो गेल्यानंतरही येत राहाते.
8. लोक विद्वानाची स्तुती करतात पण ते मूर्खांचा आदर करीत नाहीत.
9. खूप मोठा माणूस नसूनही खूप काम करणे हे खायला काही नसताना मोठेपणाचा आव आणण्यापेक्षा चांगले असते.
10. चांगला माणूस त्याच्या प्राण्यांची काळजी घेतो. पण दुष्ट माणूस दयाळू असू शकत नाही.
11. जो शेतकरी आपल्या शेतात कष्ट करतो त्याच्याकडे पुरेसे अन्न असते. पण जो माणूस फालतू गोष्टीत वेळ घालवतो तो मूर्ख असतो.
12. दुष्ट माणसाजवळ नेहमी चुकीच्या गोष्टी करायला असतात. पण चांगल्या माणसाजवळ जी शक्ती असते ती मुळाप्रमाणे खोल गेलेली असते.
13. दुष्ट माणूस मूर्ख गोष्टी करतो. स्वत:च शब्दात अडकतो. पण चांगला माणूस त्या प्रकारच्या संकटातून सुटतो.
14. जो चांगल्या गोष्टी सांगतो त्याबद्दल त्याला बक्षीस मिळते. त्याचप्रमाणे तो जे काम करतो ते त्याला लाभ मिळवून देते.
15. मूर्ख माणसाला नेहमी स्वत:ची पध्दत सर्वश्रेष्ठ वाटते. पण विद्वान माणूस दुसरे लोक जे सांगतात तेही ऐकतो.
16. मूर्ख माणसाला फार लवकर राग येतो. पण हुशार माणूस कुणी काही चुकीचे बोलले तर चटकन् क्षमा करतो.
17. जर एखादा माणूस खरे बोलत असेल तर तो ज्या गोष्टी सांगतो त्यातही तो प्रामाणिक असतो. पण जर एखादा खोटं बोलत असेल तर त्याचे बोलणे संकटाकडे नेते.
18. जर एखादा माणूस विचार न करता बोलत असेल तर ते शब्द तलवारीसारखे लागतात. पण शहाणा माणूस काळजी पूर्वक बोलतो. त्याचे शब्द दु:खावर फुंकर मारतात.
19. जर माणूस खोटे बोलला तर त्याचे शब्द लगेचच वाया जातात. पण सत्य मात्र सदैव राहाते.
20. दुष्ट लोक नेहमी संकटे आणतात. पण जे लोक शांततेसाठी काम करतात ते आनंदी असतात.
21. चांगल्या लोकांवर दुदैंव कोसळत नाही. पण दुष्टांवर मात्र अनेक संकटे येतात.
22. परमेश्वर खोटं बोलणाऱ्यांचा तिरस्कार करतो. पण परमेश्वर खरे बोलणाऱ्या लोकांबरोबर आनंदी असतो.
23. हुशार माणूस त्याला जे माहीत आहे ते सर्व सांगत नाही. पण मूर्ख माणूस त्याला जे माहीत आहे ते सर्व सांगतो आणि तो मूर्ख आहे हे दाखवतो.
24. जे लोक खूप काम करतात त्यांना इतर कामगारांवर देखरेख करण्याचे काम देतात. पण आळशी माणसाला गुलामासारखे राबावे लागते.
25. काळजी माणसाचे सुख हिरावून घेते. पण प्रेमळ शब्द त्याला आनंदी करु शकतात.
26. चांगला माणूस आपले मित्र काळजीपूर्वक निवडतो. पण दुष्ट माणूस नेहमी चुकीचे मित्र निवडतो.
27. आळशी माणूस त्याला हव्या असलेल्या गोष्टी मागे जाणार नाही पण जो माणूस खूप कष्ट करतो त्याच्याकडे श्रीमंती येते.
28. जर तुम्ही योग्य रीतीने जगलात तर तुम्हाला खरे जीवन मिळेल. सदैव जगण्याचा तोच मार्ग आहे.

  Proverbs (12/31)