Jeremiah (8/52)  

3. “मी यहूदातील लोकांना सक्तीने त्यांची घरे व त्यांचा देश सोडायला लावीन. लोकांना परक्या प्रदेशात नेले जाईल. यहूदातील जे दुष्टलोक युध्दात मारले गेले नाहीत, त्यांना आपण मारले गेलो असतो तर बरे झाले असते असे वाटेल,” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
4. यिर्मया, यहूदाच्या लोकांना हे सांग: परमेश्वर असे म्हणतो: “माणूस जमिनीवर पडल्यास पुन्हा उठतो व जर माणूस चुकीच्या मार्गाने गेला तर फिरुन मागे येतो, हे तुम्हाला माहीत आहे.
5. यहूदाचे लोक चुकीच्या मार्गाने गेले (जगले) पण यरुशलेममधील लोक चुकीच्या मार्गाने सतत का जात आहेत? ते त्यांच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. ते वळून परत येण्याचे नाकारतात.
6. मी त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले आहे. ते योग्य ते बोलत नाहीत. त्यांना त्यांच्या पापाबद्दल पश्र्चाताप वाटत नाही. त्यांनी केलेल्या वाईट कर्मांचा ते विचार करीत नाहीत. विचार केल्याशिवाय ते गोष्टी करतात. युद्धात दौडणाऱ्या घोड्यांसारखे ते आहेत.
7. आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांनासुद्धा वेळेची योग्य जाणीव असते. करकोचे, पारवे, निळवी व सारस ह्यांना नवीन घरट्यात केव्हा यायचे ते समजते. पण माझ्या लोकांना, देवाला त्यांच्याकडून काय हवे आहे ते कळत नाही.
8. “आमच्याजवळ परमेश्वराची शिकवण आहे म्हणून आम्ही शहाणे आहोत!’ असे तुम्ही म्हणत राहता. पण ते खरे नाही. का? कारण लेखक लेखण्यांच्या साहाय्याने खोटे बोलले आहेत.
9. त्या ‘शहाण्या लोकांनी’ परमेश्वराची शिकवण ऐकण्याचे नाकारले म्हणूनच ते अजिबात खरे शहाणे नाहीत. ते ‘शहाणे लोक’ सापळ्यात सापडले गेले. त्यांना धक्का बसला. त्यांची अप्रतिष्ठा झाली.
10. म्हणून मी त्यांच्या बायका दुसऱ्यांना देईन. त्यांची शेते नव्या मालकांना देईन. इस्राएलमधल्या सर्व लोकांना जास्तीच जास्त पैसा पाहिजे. अती महत्वाचे व अति सामान्य सर्व सारखेच आहेत. संदेष्ट्यांपासून याजकांपर्यंत सर्व खोटे बोलतात.
11. माझे लोक अतिशय वाईट रीतीने दुखावले जात आले आहेत. संदेष्ट्यांनी आणि याजकांनी त्यांच्या जखमा बांधाव्यात पण ते तर त्या जखमांवर, किरकोळ खरचटल्यावर करतात, त्याप्रमाणे इलाज करतात. ते म्हणतात, ‘ठीक आहे. ठीक आहेत.’ पण हे ठीक नाही.
12. संदेष्ट्यांना आणि याजकांना त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल लाज वाटली पाहिजे. पण त्यांना अजिबात लाज वाटत नाही. आपल्या दुष्कृत्यांची शरम वाटण्याएवढीही त्यांना जाणीव नाही. म्हणून बाकीच्यांबरोबर त्यांना शिक्षा होईल. मी जेव्हा लोकांना शिक्षा करीन तेव्हा हे सर्वजण जमिनीवर फेकले जातील. परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
13. “मी त्यांची फळे व पिके काढून घेईन. मग तेथे सुगीचा हंगाम होणार नाही. “हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “वेलीवंर एकही द्राक्ष नसेल. अंजिराच्या झाडांवर एकही अंजिर नसेल. एवढेच नाही तर झाडांची पानेही सुकतील व गळतील. मी त्यांना दिलेल्या गोष्टी काढून घेईन.
14. “आपण येथे नुसतेच का बसलो आहोत? या भक्कम शहराकडे पळून जाऊ या, जर परमेश्वर आपला देव, आपल्याला मारणारच असेल तर आपण तेथेच मरु या. आपण परमेश्वराविरुद्ध वागून पाप केले. म्हणून देवाने आपल्याला विषारी पाणी प्यायला दिले.
15. आम्ही शांतीची आशा केली पण आम्हाला काहीच चांगले मिळाले नाही. तो आम्हाला क्षमा करील असे आम्हाला वाटले पण अरिष्टच आले.
16. दानच्या कुळाच्या मालकीच्या भूमीवरुन येणाऱ्या शत्रूंच्या घोड्यांच्या फुरफुरण्याचा आवाज आम्ही ऐकतो. त्यांच्या खुरांच्या दणदणाटाने जमीन हादरते. ते ही भूमी व त्यावरील प्रत्येक गोष्टीचा नाश करण्यासाठी आले आहेत. ते नगराचा व त्यात राहणाऱ्या सर्व लोकांना नाश करण्यासाठी आले आहेत.
17. “यहूदाच्या लोकांनो, मी विषारी सर्प तुमच्यावर हल्ला करण्यासाठी पाठवीत आहे. त्यांना आवरणे अशक्य आहे. ते तुम्हाला दंश करतील.” हा देवाकडून आलेला संदेश आहे.
18. देवा मी फार दु:खी आहे. मी फार घाबरलो आहे.
19. माझ्या लोकांचे रडणे ऐक. ह्या देशात सगळीकडे लोक मदतीसाठी आक्रोश करीत आहेत. ते म्हणतात, “परमेश्वर अजून सियोनला आहे का? सियोनचा राजा अजून तेथेच आहे का?” पण देव म्हणतो, “यहूदाच्या लोकांनी परक्या कवडीमोलाच्या मूर्तीची पूजा केली. त्याने मला खूप राग आला. त्यांनी असे का केले?
20. लोक म्हणतात, “सुगीचा हंगाम संपला, उन्हाळा गेला, आणि तरीही आम्हाला वाचवण्यात आले नाही.”
21. माझे लोक दुखावले म्हणजे मी दुखावलो. मी दु:खातिरेकाने बोलू शकत नाही.
22. गिलादमध्ये नक्कीच काही औषध आहे. तेथे नक्कीच वैद्य आहे. मग माझ्या लोकांच्या जखमा का भरुन येत नाहीत?

  Jeremiah (8/52)